शासकीय योजनांची जत्रा : १५ जुन पर्यंत मिळणार शासकीय योजनांचा लाभ shaskiya yojana chi jatra : Washim ZP
शासकीय योजनांची जत्रा : 15 जुन पर्यंत मिळणार शासकीय योजनांचा लाभ
वाशिम जिल्हा परिषदेत जनकल्याण कक्षाची स्थापना
वाशिम, दि. 19 - दिनांक 15 एप्रिल ते 15 जून 2023 दरम्यान जत्रा शासकीय योजनांची- सर्वसामान्यांच्या विकासाची (shaskiya yojana chi jatra) हे अभीयान राबविण्यात येत आहे. या दरम्यान ग्रामिण भागातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ कसा पोहचेल याचे नियोजन विभाग प्रमुखांनी करावे असे निर्देश वाशिम जिल्हा परिषदे (Washim ZP) चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांनी दिले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुखांची आढावा सभा घेऊन याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले कि, जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ ज्या लाभार्थ्यांना अद्यापही मिळालेला नाही, त्या लाभार्थ्यांपर्यंत संबंधित यंत्रणांनी पोहोचावे. संबंधित लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, त्याची पुर्तता लाभार्थ्यांकडून करुन घ्यावी. लाभार्थ्यांकडून योजनेचा लाभ मिळण्यासाठी जो अर्ज करुन घ्यायचा आहे, तो अर्ज पुर्णपणे संबंधित यंत्रणेने भरुन घ्यावा. त्याला लागणारी सर्व कागदपत्रे सोबत जोडलेली आहे याबाबतची संबंधित विभागाने खात्री करावी. कोणत्याही गरजू लाभार्थ्याचा अर्ज नामंजूर केला जाणार नाही याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. सर्व विभाग प्रमुखांनी आपले लक्ष्य निर्धारित करुन दिनांक 13 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयानुसार कामाला लागावे असे सांगितले.
सभेला मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिनकर जाधव, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, शिक्षण अधिकारी राजेंद्र शिंदे , लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण मापारी, ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखडे, समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ, मनरेगा गट विकास अधिकारी रविंद्र सोनोने, उप शिक्षण अधिकारी गजानन डाबेराव, बांधकाम विभागाचे पाटील, पशुसंवर्धन विभागाचे चव्हाण उपस्थित होते.
दरम्यान जिल्हा परिषदेत जनकल्याण कक्षाची स्थापना झाली असल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली. या कक्षाच्या माध्यमातुन पुढील सुमारे दोन महिन्याच्या कालावधीत शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment