Header Ads

दि.१२ एप्रिल २०२१ - कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून गुढीपाडवा साधेपणाने साजरा करावा - जिल्हाधिकारी celebrate gudipadwa in simple manner - DM

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून गुढीपाडवा साधेपणाने साजरा करावा
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांचे आवाहन

वाशिम, दि. १२ (जिमाका) :  गतवर्षी राज्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव झाल्यापासून सर्व सण, उत्सव हे अत्यंत साधेपणाने व लोकांनी एकत्रित न जमता केलेले आहेत. सध्या कोरोना विषाणू सासर्गाच्या प्रमाणत गतवर्षीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी यावर्षी गुढीपाडवा हा सण अत्यंत साधेपणाने सकाळी ७ वाजेपासून ते रात्री ८ वाजण्यापूर्वी साजरा करावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी १२ एप्रिल रोजी आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशात म्हटले आहे की, या वर्षी कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवू नये. त्याऐवजी आता सार्वजनिक ठिकाणी एकावेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिस्टन्सिंगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पालन करुन घरगुती गुढी उभारून हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा.

गुढीपाडवा सणादिवशी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे (उदा. रक्तदान) स्थानिक प्रशासनाच्या पुर्वानुमतीने आयोजित करता येतील आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल. तथापी आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना कोविड विषयक सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग, संक्रमण वाढणार नाही. 

राज्यातील कोविड-१९ विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे कोटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष गुढीपाडव्याच्या दिनांकापर्यंत शासनस्तरावरुन आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.