Header Ads

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामासाठी मजुरांनी ग्रामपंचायत, तालुका स्तरावर मागणी नोंदवावी

 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामासाठी मजुरांनी ग्रामपंचायत, तालुका स्तरावर मागणी नोंदवावी

उपजिल्हाधिकारी (रोहयो) शैलेश हिंगे यांचे आवाहन 

    वाशिम, दि. ११ (जिमाका) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील मजुरांनी मागणी केल्यानंतर त्यांना गावात अथवा लगतच्या गावात रोजगार उपलब्ध करून दिला जातो. तरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील जॉबकार्डधारक अकुशल मजुरांनी रोजगाराची आवश्यकता असल्यास संबंधित ग्रामपंचायत, तालुका स्तरावर कामाची मागणी नोंदवावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) शैलेश हिंगे यांनी केले आहे.

    जिल्ह्यातून कामानिमित्त मजुरांचे होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी, त्यांना मागणीनंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. यासाठी जिल्ह्यात ३ हजार २५ कामे सेल्फवर ठेवण्यात आली आहेत. यामधून ६ लक्ष ८३ हजार मजूर क्षमता निर्माण होणार आहे.

    काम मागणीसाठी जॉबकार्डधारक अकुशल मजुरांनी नमुना क्र. ४ मध्ये लेखी अर्ज ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, पंचायत समिती अथवा तहसील कार्यालय यापैकी कोणत्याही एका ठिकाणी भरून द्यावा. या अर्जासोबत बँक पासबुकची व आधारकार्डची छायांकित प्रत जोडावी. ज्या अकुशल मजूर कुटुंबाकडे जॉबकार्ड नाही, अशा मजुरांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती अथवा तहसील कार्यालयाकडे तात्काळ जॉबकार्डची मागणी नोंदवावी. मजुरांनी रोजगार मागणीसाठी अर्ज केल्यापासून १५ दिवसांचे आता काम न मिळाल्यास नियमानुसार बेरोजगार भत्ता अनुज्ञेय राहील, असे उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.