Dharmaguru Sant Shri Ramrao Bapu Maharaj Passed Away - धर्मगुरु संत श्री रामराव बापू महाराज यांचे निधन
देशातील संपूर्ण बंजारा समाजावर पसरली एकच शोककळा
कारंजा (जनता परिषद) दि.३१ - बंजारा समाजाचे श्रद्धास्थान, श्रीक्षेत्र पोहरादेवी महापिठाचे प्रमुख धर्मगुरु संत रामराव महाराज यांचे काल दि. ३० ऑक्टोंबर रोजी उपचारा दरम्यान मुंबई येथे निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते. त्यांच्या या निधनामुळे संपूर्ण बंजारा समाजावर तसेच त्यांना आदरस्थानी मानणार्या संपूर्ण समाजमनावर एकच शोककळा पसरली आहे. पोहरादेवी येथे त्यांचेवर रविवार १ रोजी दुपारी १ वाजता अंतीम संस्कार करण्यात येणार आहे. (सुरुवातीला सोमवार दि.२ नोव्हेंबर रोजी अंतीम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती.)
धर्मगुरु रामराव महाराज यांना श्वसनाचे त्रासामुळे मुंबई येथील लिलावती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान काल रात्री तेथे त्यांची प्राणज्योत मालवली.
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील ग्राम श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण भारतातील संपूर्ण बंजारा समाजाची काशी म्हणून मानले जाते. समाजाचे संत सेवालाल महाराज, आई जगदंबा तसेच धर्मगुरु डॉ.रामराव महाराज यांच्या दर्शनार्थ लाखो भावीक भक्त हे देश-विदेशातून पोहरादेवी येथे येत असतात. बंजारा समाजाची काशी असलले श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील गादीवर संत श्री रामराव महाराज हे १९४८ मध्ये विराजमान झाले होते. त्यांनी समाजाला दिशा देणे, व्यसनापासून मुक्ती, शिक्षणाचा प्रसार, आध्यात्मिक विचार रुजविण्याचे कार्य त्यांनी आपल्या आयुष्यात अखंडपणे व अविरतपणे केले.
(Dharmaguru Sant Shri Ramrao Bapu Maharaj) धर्मगुरु संत रामराव महाराज यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच अनेको गणमान्य व्यक्तींनी दु:ख व्यक्त केले आहे.
Post a Comment