Header Ads

डॉ. रामराव महाराज यांच्या निधनाने समाजाचे आध्यात्मिक मार्गदर्शक छत्र हरपले – मुख्यमंत्री


डॉ. रामराव महाराज यांच्या निधनाने समाजाचे आध्यात्मिक मार्गदर्शक छत्र हरपले – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तपस्वी डॉ. रामराव महाराज यांना श्रद्धांजली 

मुंबई (महासंवाद द्वारा) दि. 31 : – बंजारा समाजाचे श्रद्धास्थान तपस्वी डॉ. रामराव महाराज यांच्यासारख्या थोर विभूतीच्या निधनाने केवळ बंजारा समाजाचेच नव्हे तर सर्व समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, बंजारा समाजाचे श्रद्धास्थान ,धर्मगुरू डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनाने खूप दुःख झाले. डॉ. रामरावजी महाराज यांनी संत सेवालाल महाराज यांचा वारसा चालवताना समाजातील अनिष्ट प्रथांवर नेहमीच  प्रहार केला आणि जनजागृतीचे मोठे कार्य केले. श्री पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा, तसेच राज्यातील तांड्यांचा विकास व्हावा, यासाठी ते आग्रही होते. प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. व्यसनापासून दूर राहावे, शिक्षण घ्यावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. श्रद्धास्थान, धर्मगुरु म्हणून त्यांचा अनुयायांना मोठा आधार होता. त्यांच्या निधनामुळे अध्यात्मासह, समाज सुधारणेच्या क्षेत्रातील मार्गदर्शक छत्र हरपले आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर  चालत राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. डॉ. रामरावजी महाराज यांना त्रिवार वंदन.

No comments

Powered by Blogger.