Header Ads

एस.एम.देशमुख यांचे नेतृत्वात एका शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट



एस.एम.देशमुख यांचे नेतृत्वात एका शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

पत्रकारांचा प्रतिनिधी विधान परिषदेत असावा

किरण नाईक यांची महामहिम यांना विनंती 


     मुंबई दि.२६ - ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखीलील एका शिष्टमंडळाने  काल राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व निवेदन दिले.
     राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. राज्यपाल विधान परिषदेवर 12 सदस्य नियुक्त करणार आहेत.. घटनेतील कलम 171 (5)नुसार राज्यपालांच्या कोट्यातून साहित्य, विज्ञान, कला, पत्रकारिता, सामाजिक कार्य आदि क्षेतातील लोकांचीच नियुक्ती करावी असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. राज्यपाल महोदयांनी नियुक्त्या करताना घटनेतील या तरतुदींचा आग्रह धरावा अशी विनंती देशमुख यांनी राज्यपालांना केली आहे.

     राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील पत्रकार होते. त्यामुळे त्यांनी पत्रकारितेतील सध्याच्या बदलांची माहिती जाणून घेतली. राज्यात पत्रकारांना पेन्शन मिळवून देण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेनं केलेल्या संघर्षाची माहिती त्यांना देण्यात आली.  "महाराष्ट्र हे देशातील असे एकमेव आणि पहिले राज्य आहे की, जेथे पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळालेले आहे". हे एेकून राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. "कायदा झाला असला तरी या कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे होत नसल्यानं पत्रकारांवरील हल्ले थांबत नसल्याचे देशमुख यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. पत्रकार संरक्षण कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केली.

     " पत्रकारांचा प्रतिनिधी विधान परिषदेत असावा" अशी विनंती किरण नाईक यांनी राज्यपाल महोदयांकडे केली. त्यासाठी पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्ते एस.एम.देशमुख यांना संधी मिळावी अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली. त्यावर राज्यपालांनी पत्रकारांचा प़तिनिधी सभागृहात असला पाहिजे  यावर सकारात्मक प्रतिसाद दिला.

     पंधरा मिनिटे ही भेट चालली. भेटीनंतर एस.एम.देशमुख यांनी लिहिलेली संघर्षाची पंच्याहत्तरी आणि कथा एका संघर्षाची  ही दोन पुस्तके राज्यपालांना भेट दिली.

     "मराठी पत्रकार परिषद ही राज्यातील पत्रकारांची सर्वात जुनी आणि 82 वर्षांची देदीप्यमान परंपरा असलेली संस्था असून राज्यातील 8 हजार पत्रकार परिषदेशी जोडलेले आहेत" अशी माहिती यावेळी शरद पाबळे आणि बापुसाहेब गोरे यांनी राज्यपाल महोदयांना दिली. त्यावर राज्यपालांनी समाधान व्यक्त केले.

     राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, मिडिया सेलचे राज्य निमंत्रक बापुसाहेब गोरे, स्वप्निल नाईक आदिंचा समावेश होता..

No comments

Powered by Blogger.