Header Ads

जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता आणि स्थलांतरितांची काळजी घ्या


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतचजीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता आणि स्थलांतरितांची काळजी घ्या


विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांचे प्रशासनाला आदेश 


वाशिम, दि. ०७ (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता झाली पाहिजे. जिल्ह्यात विविध तात्पुरत्या निवारा शिबिरात असलेल्या स्थलांतरित व्यक्तींना दोन्ही वेळचे नियमित भोजन उपलब्ध करून देवून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले.
आज, ७ एप्रिल रोजी कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. सिंह म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ते आरोग्य उपकेंद्र येथे कोणत्याही प्रकारचा ताप असलेले रुग्ण आले तर त्यांची आरोग्य तपासणी तेथे सुरु करण्यात आलेल्या फिव्हर क्लिनिकच्या माध्यमातून करावी. याबाबतचा दैनंदिन अहवाल उपलब्ध करून द्यावा. जिल्ह्यात औषधांचा तुडवडा भासणार नाही, यासाठी आवश्यक औषधी, मास्क, उपकरणे व साहित्याची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व खासगी दवाखान्यांच्या ओपीडी सुरु राहतील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासणार नाही, तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अखंडित सुरु राहील, तसेच कृषि निविष्ठांची वाहतूक सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घ्यावी. लॉकडाऊनचा गैरफायदा घेवून चढ्या दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री होणार नाही, याची खात्री करावी. स्वस्त धान्य दुकानांमधून नियमित अन्नधान्य वाटप तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थींना ५ किलो मोफत तांदूळ देण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून जनधन योजनेच्या महिला खातेधारकांच्या खात्यात प्रत्येकी पाचशे रुपये जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. सदर पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी होवू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, भूसंपादन अधिकारी सुहासिनी गोणेवार, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे उपस्थित होते.


क्वारंटाईन वार्ड, आयसोलेशन वार्डची पाहणी

कोरोना बाधित क्षेत्रातून अथवा कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना निगराणीखाली ठेवण्यासाठी जिल्हा महिला रुग्णालय परिसरातील परिचारिका प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन वार्ड सुरु करण्यात आला आहे. तसेच कोरोना बाधित व्यक्तींवर उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्ड सुरु करण्यात आला असून या दोन्ही वार्डची आज विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी पाहणी केली व आवश्यक त्या सूचना केल्या.


वाशिम येथील तात्पुरत्या निवारा केंद्राला भेट

लॉकडाऊन काळात स्थलांतरित कामगार, नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत मोफत निवारा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. वाशिम येथील शासकीय तंत्र निकेतनमध्ये सुरु करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रात राजस्थान येथील सुमारे २६५ व्यक्तींच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवारा केंद्राला भेट देवून विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी तेथील सुविधांची पाहणी केली. तसेच या निवारा केंद्रात असलेल्या सर्व व्यक्तींच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेण्याची सूचना केली.

No comments

Powered by Blogger.