Header Ads

बँकांमध्ये अनावश्यक गर्दी टाळा, टपाल विभागाच्या सेवेचा लाभ घ्या


बँकांमध्ये अनावश्यक गर्दी टाळा, टपाल विभागाच्या सेवेचा लाभ घ्या -    जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक


प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची रक्कम वेळापत्रकानुसार काढता येणार

९ एप्रिल नंतर केव्हाही रक्कम काढता येईल


वाशिम, दि. ०३ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत म्हणून केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री जनधन योजनेच्या महिला खातेधारकांच्या खात्यात प्रत्येकी पाचशे रुपये रक्कम जमा करण्यात येत आहे. बँक खात्याच्या शेवटच्या अंकानुसार तयार करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार टप्प्या-टप्प्याने हे पैसे जमा होणार असून नागरिकांनी एकाच दिवशी बँकेमध्ये गर्दी करू नये. तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या खातेधारकांनी खात्यातील रक्कम काढण्यासाठी टपाल विभागाच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे  एप्रिल, मे व जून महिन्यात जनधन योजनेचे खाते असलेल्या महिलांच्या खात्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येकी पाचशे रुपये जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार बँक खात्याचा शेवटचा अंक ०,१,२,३ असलेल्या खात्यांतून ४ एप्रिल रोजी पैसे काढता येतील. बँक खात्याच्या शेवटचा अंक ४ व ५ असलेल्या खात्यात ७ एप्रिल रोजी, शेवटी ६ व ७ अंक असलेल्या बँक खात्यात ८ एप्रिल रोजी आणि ज्या बँक खात्याच्या शेवटी ८ व ९ अंक आहेत, अशा बँक खात्यात ९ एप्रिल रोजी पैसे जमा होणार आहेत. पैसे जमा झालेल्या दिवशी अथवा ९ एप्रिल २०२० नंतर केव्हाही खातेधारकाला हे पैसे काढत येतील, त्यामुळे खातेधारकांनी एकाच दिवशी बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

वाशिम जिल्ह्यातील १६४ टपाल कार्यालयात पैसे काढण्याची सुविधा
कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या खातेधारकाला आपल्या खात्यातून १० हजार रुपये रक्कम काढण्याची सुविधा टपाल विभागाने वाशिम जिल्ह्यातील १४२ गावातील १६४ टपाल कार्यालयात उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या जनधन खाते असलेल्या महिला तसेच इतर नागरिक सुद्धा आपल्या गावातील अथवा नजीकच्या गावातील टपाल कार्यालयात जावून आपल्या बँक खात्यातील रक्कम काढू शकतात. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घेवून बँकेत होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण जिल्ह्यात १५ एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सर्व बँकांमध्ये सुद्धा या आदेशाचे पालन होणे आवश्यक आहे. तसेच बँकेमध्ये येणाऱ्या ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावयास लावण्याची जबाबदारी बँकांची आहे. त्यामुळे बँकांनी ग्राहकांना उभा राहण्यासाठी किमान एक मीटर अंतरावर याप्रमाणे खुणा आखाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यावेळी दिल्या.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील पैसे काढण्याचे वेळापत्रक


बँक खात्याचा शेवटचा अंक
पैसे काढण्याची तारीख
०,१,२, आणि ३
४ एप्रिल २०२०
४ व ५
७ एप्रिल २०२०
६ व ७
८ एप्रिल २०२०
८ व ९
९ एप्रिल २०२०

वरील तारखेला पैसे न काढल्यास ९ एप्रिल २०२० नंतर केव्हाही बँक खात्यातून पैसे काढता येतील.

No comments

Powered by Blogger.