Header Ads

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ सहा दिवस शिल्लक - six days remained to take pm pik vima yojana

PM Pik Vima Yojana प्रधानमंत्री पीक विमा योजना


प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ सहा दिवस शिल्लक

  • जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
  • १५ जुलैपर्यंत ‘सीएससी’, बँकेमध्ये विमा हप्ता भरता येईल
  • पीक विमा योजनेसाठी ‘सीएससी’ रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार

वाशिम, दि. ०९ (जिमाका) : खरीप हंगाम २०२१ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक असून खरीप हंगाम २०२१ करिता योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२१ पर्यंत आहे. वाशिम जिल्ह्यातील ज्वारी, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस या पिकांचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजनेत आहे. पीक विमा हप्ता भरून या योजनेत सहभागी होण्यासाठी आता केवळ सहा दिवसांचा कालावधी राहिला असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

वाशिम जिल्ह्यात सन २०२१-२२ खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविणेकरीता रिलायन्स  जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड सोबत करार झालेला आहे. खरीप हंगामामध्ये जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात समाधानकारक पाऊस झाला असल्याने खरीप पेरणीला चांगल्याच प्रकारे सुरुवात होऊन उगवण समाधान कारक झाली. परंतु, जून महिन्‍याच्या २९ तारखेपासून पावसाने खंड दिल्यामुळे उशिरा पेरलेल्या पिकांचे उगवणीवर व पहिल्या टप्प्यात पेरलेल्या पिकांच्या वाढीवर परिणाम दिसून आला. भविष्या‍मध्ये या पिकांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो.

भविष्यामध्ये येणारे निसर्गातील चढ-उतार,कमी-आधिक पाऊस या सर्व बाबींपासून पिकांना संरक्षण मिळण्यासाठी पीक विमा योजनेचा लाभ हा निश्चित दिलासा देणारा होऊ शकतो. या योजनेमध्ये सहभाग घेतल्यानंतर पिकास दुष्काळ, पूर, भूस्खलन, चक्रीवादळ, अतिवृष्टी, कीड, रोगराई, पावसातील खंड, नैसर्गिक आग, वीज कोसळणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या पीक नुकसानीस संरक्षण मिळणार आहे.

या योजनेंतर्गत खरीप हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसान म्हणजेच पीक काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय राहील. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत दुष्काळ, पावसातील खंड, पूर, क्षेत्र जलमय होणे, कीड व रोगाचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट आणि चक्रीवादळ यासारख्या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाईल.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकाचे ठरावीक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येईल. काढणी पश्चात नुकसानामध्ये ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधुन सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी, काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचेकाढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत (१४ दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.

वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने घेण्यात येणाऱ्या सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद व खरीप ज्वारी या पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश असून ही योजना जिल्ह्यातील सर्व मंडळांना लागू आहे. योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२१ असून विमा हप्ता भरण्यासाठी आता केवळ ६ दिवस शिल्लक आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र (सीएससी) अथवा बँकेत जावून विमा हप्ता भरवा. या काळात सामुहिक सेवा केंद्र रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी विमा कंपनीचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी, बँक अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. तोटावार यांनी केले आहे.

पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता

पीक

प्रति हेक्टर संरक्षित रक्कम

शेतकऱ्यांनी प्रति हेक्टर भरावयाचा विमा हप्ता

खरीप ज्वारी

रु. २५०००/-

रु. ५००/-

सोयाबीन

रु. ४५०००/-

रु. ९००/-

मुग

रु. १९०००/-

रु. ३८०/-

उडीद

रु. १९०००/-

रु. ३८०/-

तूर

रु. ३१५००/-

रु. ६३०/-

कापूस

रु. ४३०००/-

रु. २१५०/-

 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.