Header Ads

खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू pradhanmantri pik vima yojana for kharip crop



खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

वाशिम, दि. ०१ (जिमाका) : खरीप हंगाम २०२१ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक असून खरीप हंगाम २०२१ करिता योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक १५ जुलै २०२१ पर्यंत आहे. वाशिम जिल्ह्यातील ज्वारी, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस या पिकांचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजनेत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसुचित मुख्य पिकांची अधिसुचित क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी, लावणी न झाल्यास विमा संरक्षण देय राहील. तसेच सर्वसाधारण काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसुचित क्षेत्रस्तरावर विमा संरक्षण देय राहील. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाईल. अधिसुचितविमा क्षेत्र घटकातील पिक कापणी प्रयोगावरुन उपलब्ध झालेल्या सरासरी उत्पन्नाची तुलना उंबरठा उत्पन्नाशी करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाईल. जर सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आले तर नुकसान भरपाई देय होईल.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आगया स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकाचे ठरावीक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येईल. काढणी पश्चात नुकसानामध्ये ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधुन सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी, काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचेकाढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत (१४ दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.

काढणी पश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखिमे अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत ‘क्रॉप इंश्युरंन्स ॲप’ किंवा  संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक अथवा बँक वा कृषि व महसूल विभाग यांना कळवावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक आहे. वाशिम जिल्ह्यासाठी रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि. (टोल फ्री क्र. १८००१०२४०८८) या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.