Header Ads

खरीप हंगाम २०२१ पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन - kharif hangam 2021 pik spardha, kharif season 2021 crop competition



खरीप हंगाम २०२१ पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन

kharif hangam 2021 pik spardha

वाशिम, दि. २६ (जिमाका) : खरीप हंगाम २०२१ साठी कृषि विभागामार्फत पीक स्पर्धेचे (kharif hangam 2021 pik spardha / kharif season 2021 crop competition) आयोजन करण्यात आले आहे. मूग व उडीद पिकांसाठी ३१ जुलै २०२१ पुर्वी व इतर खरीप पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२१ पूर्वी अर्ज सादर करुन या पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल. तसेच शेतकरी अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या खरीप हंगामापासून पुर्वीच्या पिकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करुन नव्याने स्पर्धा राबविण्यात येत आहे.

पीक स्पर्धेसाठी पीक निहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशा एकूण ११ पिकांचा समावेश आहे. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटासाठी ५ राहील. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या शेतावर त्यापिकाखाली किमान १० आर. क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीक स्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात सर्वसाधारण गटासाठी ५ व आदिवासी गटासाठी ४ पीक कापणी प्रयोग घेतले जातील. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम तीनशे रुपये असून अर्ज दाखल करण्याची मुदत मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै २०२१ तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल पिकासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत आहे.

पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन,  सातबारा, ८ अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावे. पीक स्पर्धा विजेत्यांसाठी स्पर्धा पातळी निहाय सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस स्वरुप पुढीलप्रमाणे राहील. तालुका पातळीवर पहिले बक्षिस ५ हजार रुपये, दुसरे  बक्षीस ३ हजार रुपये, तिसरे बक्षीस २ हजार रुपये; जिल्हा पातळीवरील पहिले बक्षिस १० हजार रुपये, दुसरे बक्षीस ७ हजार रुपये, तिसरे बक्षीस ५ हजार रुपये तर  विभाग पातळीवर पहिले बक्षिस २५ हजार रुपये, दुसरे  बक्षीस २० हजार रुपये, तिसरे बक्षीस १५ हजार रुपये राहील. राज्य पातळीवर पहिले बक्षिस ५० हजार रुपये, दुसरे  बक्षीस ४० हजार रुपये, तिसरे बक्षीस ३० हजार रुपये याप्रमाणे राहील.

पीक स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. रब्बी हंगाम २०२० पीक स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्याचप्रमाणे खरीप हंगाम २०२१ साठी देखील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.