Header Ads

दि १५ एप्रिल २०२१ - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्वाचे - जिल्हाधिकारी : DM appeal - next 15 days very crucial

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्वाचे
अत्यावश्यक कारण असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांचे आवाहन 

  • संचारबंदी नियमांचे पालन करा; स्वयंशिस्त पाळा
  • विनाकारण घराबाहेर पडल्यास दंडात्मक कारवाई

वाशिम, दि. १५ (जिमाका) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात १ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. या कालावधीत सर्व नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन करावे. घरी राहून स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातही कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या प्रयत्नांना नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे. जिल्ह्यात सध्या संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जारी करण्यात आलेल्या नियमावलीचे सर्व नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे हा सद्यस्थितीतील प्रभावी उपाय आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करून या संसर्गापासून बचावासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, तसेच कोरोना विषाणू संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले. संचारबंदी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

लक्षणे असल्यास तातडीने कोरोना चाचणी करा

कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानंतर त्याचे तातडीने निदान झाल्यास व योग्य उपचार मिळाल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता अधिक आहे. याउलट परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, घसादुखी यासारखी लक्षणे दिसल्यास घरगुती उपाय अथवा इतर उपचार न करता त्वरित शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये जावून कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.


*****

No comments

Powered by Blogger.