Header Ads

मास्कचा वापर न केल्यास कारवाई - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.



मास्कचा वापर न केल्यास कारवाई - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

ग्राहकासोबतच दुकानदार, आस्थापनाधारकावर होणार कारवाई
नागरिकांनी कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन

वाशिम, दि. १६ (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी सर्व नागरिकांसह हॉटेल, रेस्टॉरंट, बाजारपेठ, पेट्रोलपंप, मंगल कार्यालये यासारख्या आस्थापनाधारकांनी कोरोना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. दुकाने अथवा आस्थापनांच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्यास, मास्कचा वापर न केल्यास संबंधित ग्राहकासोबतच आस्थापना मालकावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज, १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी सुनील विंचनकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, कारंजाचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांच्यासह तहसीलदार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी. चेहऱ्यावर मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. बाजारपेठ, हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने, पेट्रोलपंप, लग्न अथवा इतर समारंभ, खेळाची मैदाने यासह सार्वजनिक ठिकाणी जाताना चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.  तसेच या ठिकाणी मास्क न लावलेल्या व्यक्ती आढळल्यास संबंधित आस्थापना मालकावर सुद्धा कारवाई केली जाईल.

सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी तालुकास्तरावर सर्व आस्थापनाधारकांच्या संघटनांची बैठक घेवून त्यांना कोरोन सुरक्षा विषयक नियमांचे पालन करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावे. मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन या त्रिसूत्रीचे पालन होणे आवश्यक असून याची जबाबदारी संबंधित आस्थापनाधारकाची असणार आहे, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यावेळी म्हणाले.

कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवा

कोरोना बाधितांचा लवकर शोध घेवून त्यांना अलगीकरणात ठेवल्यास हा संसर्ग वाढणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी सर्व तहसिलदारांनी तालुकास्तरावर गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सोबत बैठक घेवून सूक्ष्म नियोजन करावे. कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी होणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले.

No comments

Powered by Blogger.