Header Ads

ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याबाबतचा विरोधक गैरसमज पसरवत आहेत - जयंत पाटील

 ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याबाबतचा विरोधक गैरसमज पसरवत आहेत - जयंत पाटील

महाराष्ट्रात अशा कोणत्याही कृतीला किंवा घटनांना राष्ट्रवादी पाठबळ देणार नाही 

ओबीसी सेलची आढावा बैठक प्रदेश कार्यालयात पार पडली

मुंबई दि. १३ ऑक्टोबर - ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार आहे असा गैरसमज विरोधकांकडून पसरवला जातोय. मात्र धक्का लावलेला आम्हीही सहन करणार नाही हे लक्षात घ्या असे सांगतानाच महाराष्ट्रात अशा कोणत्याही कृतीला किंवा घटनांना राष्ट्रवादी पाठबळ देणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ओबीसी सेलच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले.

ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे यांनी दौरे करुन पक्ष मजबूत करण्याचे काम करत आहेत त्याबद्दल कौतुक केले. अठरा पगडमधील जमातींवर कोरोनाचे संकट आले होते. त्या काळात ईश्वर बाळबुद्धे हे सरकारला उपाययोजना सांगत होते.

काही राजकीय पक्ष मंदीर उघडा बोलत आहेत परंतु महाराष्ट्रात जेवढं आम्ही ओपन करत आहोत तेवढा कोरोना वाढला आहे. त्यामुळे एकत्रित माणसं गोळा होण्याचं टाळलं पाहिजे. सर्व धर्माच्या देवांनी लोकांनी गर्दी करु नका हे स्वीकारले आहे. आम्ही उपजीविकेची साधने ओपन केली आहेत. नवरात्र उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करावा असे स्पष्ट केले आहे. आम्ही मर्यादित तत्वावर काम करतोय. त्यामुळे सर्वच धर्मांना विनंती करतोय. ज्यांना धर्माशिवाय जमत नाही ते धर्माचे राजकारण करत आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.

कोरोनाची नोव्हेंबरमध्ये आणखी लाट येण्याची शक्यता आहे त्यामुळे सांभाळून पावले टाकली पाहिजेत असेही जयंत पाटील म्हणाले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार्‍या पालघर, खारघर, आणि नवीमुंबई, गोवा येथील कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

आज महत्त्वाचा दिवस येवला येथे डॉ. बाबासाहेबांनी जाहीर केले होते ज्या धर्मात जनावरांसारखी वागणूक मिळते त्या धर्मात राहणार नाही असे जाहीर केले होते तो हा १३ ऑक्टोबर दिवस असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

ओबीसींना आरक्षण देणार हे जालना येथे पवारसाहेबांनी जाहीर केले आणि एका महिन्यात आरक्षण जाहीर केले. अठरापगड जातींना आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून आरक्षण लागू केले त्यावेळी सुप्रीम कोर्टानेही त्यावर शिक्कामोर्तब केले होते हेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

ओबीसींना १७ टक्के आरक्षण आहे. ओबीसी ही जात नाही तर वर्ग आहे. आरक्षण गरीबी हटाव नाही तर हजारो वर्षे ज्या जातींवर जुलुम झाला त्या जातींना सक्षम करण्यासाठी आहे. शाहू महाराजांनी राज्यकर्ते म्हणून त्यावेळी आरक्षण दिले त्यानंतर बर्‍याच वर्षांनी राज्यकर्ते म्हणून शरद पवारसाहेबांनी आरक्षण दिले याची आठवण छगन भुजबळ यांनी करुन दिली.

ओबीसी समाज ४०० जातींमध्ये विभागला गेला आहे. या समाजात अनेक नेते आहेत. हा दबलेला समाज आहे. तो एकत्र यायला तयार नाही. मात्र आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करायला हवे कारण आपला नेता सर्वांचा विचार करणारा... सर्वांना न्याय देणारा नेता आहे. सर्वच क्षेत्रात पवारसाहेबांनी आपला ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रावर कोणतेही संकट येवू दे पहिल्यांदा तिथे धावणारा असा आपला नेता आहे. त्यामुळे पवारसाहेबांना शक्ती देवुया आपल्याला शक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या असेही छगन भुजबळ म्हणाले.

बोर्ड लावून किंवा कार्ड छापून काही होणार नाही. तुम्हाला त्यामुळे ओळखणार नाही म्हणून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी काम करा असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

ओबीसी सेलची आढावा बैठक प्रदेश कार्यालयात आज पार पडली.

यावेळी भाजपाचे खारघरमधील नरेश पाटील, अशोक पवार, कल्पेश मयेकर, आदींसह गोव्यातील अपक्ष कार्यकर्ते प्रशांत पारसेकर,बाबुराव चोपडेकर, सुरज बेहरे, अमरेश गडकर, कृष्णा पारसेकर यांनी ओबीसी सेलमध्ये प्रवेश केला.

या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, प्रदेश सरचिटणीस राज राजापुरकर, प्रदेश उपाध्यक्ष सचिन औटे उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.