Header Ads

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गरज भासल्यास खाजगी डॉक्टारांना शासकीय सेवेसाठी सक्तीने घ्यावे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गरज भासल्यास खाजगी डॉक्टारांना शासकीय सेवेसाठी सक्तीने घ्यावे 

 वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश 

     उस्मानाबाद,दि.26 (जिमाका) - कोवीड-19 चा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा सर्वतोरीने प्रयत्न करीत आहे.मात्र रुग्णांची संख्या वाढत असून या रुग्णांना आरोग्य सेवा देण्यास आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने ती भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार दिले असून त्यांनी खाजगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांना कोवीड -19 च्या अनुषंगाने  रुग्णांच्या सेवेसाठी शासकीय रुग्णालयात घ्यावे, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री अमित देशमुख  यांनी दिले.
      जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कोवीड-19 आढावा बैठकीचे आयोजन ना.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,आमदार कैलास घाडगे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे, शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रकाश खापर्डे, तहसिलदार गणेश माळी,न.प.उस्मानाबादचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे  आदी उपस्थित होते.
       वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख पुढे म्हणाले की, उस्मानाबाद येथे कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी लॅब मध्ये मशीन लवकरच बसविण्यात येणार असून ती येण्यापूर्वी संबंधित तज्ञांना प्रशिक्षणासाठी लातूर किंवा सोलापूर येथे पाठविल्यास मशीन बसविल्यानंतर तपासणी करण्यास वेळ वाया जाणार नाही.तसेच हे मशीन बसविण्यासाठी डॉ.लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली मायक्रो बायोलॉजिकल तज्ञाची नियुक्ती करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
      जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालये सुरू आहेत की नाही याबाबत खात्री करावी व त्या रुग्णालयातून आवश्यक आरोग्यसेवा रुग्णांना उपलब्ध झाल्या पाहिजेत. तसेच उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकर सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबीची पूर्तता प्रशासनाने तात्काळ करावी अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी दिल्या.
      कोरोना च्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडे औषधीचा पुरेसा साठा असणे गरजेचे आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने औषधीचा मुबलक साठा करून ठेवावा. जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण व होम कोरंटाईन ची परिस्थिती कशी आहे याची माहिती घेऊन संस्थात्मक विलगीकरण कक्षातील व्यक्तींना आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व त्यांची नियमित तपासणी करावी.तसेच होम कोरानटाईन केलेल्या व्यक्तींशी ही आशा वर्कर अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून संपर्कात राहावे, असे निर्देश श्री देशमुख यांनी दिले.
    यावेळी जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे व खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील जिल्हयातील आरोग्य यंत्रणेसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी मंत्री महोदयाच्या निर्देशनास आणुन दिल्या.
      प्रारंभी जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने पहिल्या लॉक डाऊन पासून ते आज पर्यंत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही वडगावे यांनी कोरोना बाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक गावस्तरावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

No comments

Powered by Blogger.