Header Ads

मे व जून महिन्यात मिळणार प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ

रेशनकार्ड नसलेल्या विस्थापित मजूर, रोजंदारी मजूर कुटुंबाना मे व जून महिन्यात मिळणार प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ

जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांची माहिती

     वाशिम, दि. २१  (जिमाका) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह ५ किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली आहे.

     देशातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल ते जून २०२० या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत तसेच एपील शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपील (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून २०२० या दोन महिन्याच्या कालावधीत सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ देण्यात आला आहे. तथापि, या योजनांव्यतिरिक्त विना शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा लाभ देण्यात आला नव्हता. आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत जे विस्थापित मजूर  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेच्या शिधापत्रिका नाहीत, त्यांना मे व जून २०२० या दोन महिन्याकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह ५ किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

     शासनाच्या या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमधील शिधापत्रिकेसाठी अर्ज केला आहे. परंतु अद्यापपर्यंत त्यांना शिधापत्रिका प्राप्त न झालेल्या व्यक्ती, अन्न धान्याची गरज असलेले सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विस्थापित मजूर, रोजंदारी मजूर अशा  विनाशिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. याकरिता ग्रामीण भागातील पात्र व्यक्तींनी  कोविड प्रतिबंध ग्रामरक्षा समिती अथवा रास्तभाव दुकानदार यांच्याकडे तसेच शहरी भागातील व्यक्तींनी आपल्या वार्डातील अथवा नजीकच्या रास्तभाव दुकानदाराकडे आपल्या कुटुंबातील व्यक्तींची नावे व आधारक्रमांक आदी माहिती सादर करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. जाधव यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.