Header Ads

जिल्ह्यात विना परवानगी प्रवेश केल्यास गुन्हा दाखल होणार

जिल्हाधिकारी यांनी होमक्वारेंटाइन व संचारबंदी बाबत दिले सुधारित आदेश 

जिल्ह्यात विना परवानगी प्रवेश केल्यास गुन्हा दाखल होणार

* संचारबंदीची अंमलबजावणी अधिक कडक होणार
* ‘होम क्वारंटाईन’च्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

* विना परवानगी जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींची माहिती द्या

* अत्यावश्यक कारणासाठी फ़क्त पोलिस महासंचालक किंवा जिल्हा पोलिस अधिक्षकच देणार परवानगी

     वाशिम, दि. १५ (जिमाका) : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकमेव रुग्ण आढळून आला आहे. मात्र, यापुढील काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. संचारबंदी व जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून, रीतसर पूर्वपरवानगी न घेता जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. तसेच यापूर्वी जिल्ह्याच्या आलेल्या ज्या व्यक्ती ‘होम क्वारंटाईन’च्या आदेशाचे उल्लंघन करीत आहेत, अशा व्यक्तींवर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

     कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकमेव रुग्ण जिल्ह्यात आढळून आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हा बंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्तीला वाशिम जिल्ह्यात प्रवेश करावयाचा असल्यास, त्यांनी ते सध्या ज्या जिल्ह्यात आहेत, तेथील पोलीस उपायुक्त अथवा पोलीस अधीक्षक यांची रीतसर परवानगी आणणे आवश्यक आहे. विना परवानगी कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच इतर कोणत्याही मार्गांनी विना परवानगी जिल्ह्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींना जिल्ह्याबाहेर काढून त्यांच्यावर कलम १८८ व साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ नुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

‘होम क्वारंटाईन’च्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

     जिल्ह्यात यापूर्वी आलेल्या नागरिकांना ‘होम क्वारंटाईन’चे आदेश देवून त्यांना घरीच अलगीकरणात थांबण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण व शहरी भागातही काही व्यक्ती या आदेशाचे उल्लंघन करून खुलेआम फिरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे ‘होम क्वारंटाईन’च्या सूचना असलेल्या व्यक्ती गावात अथवा शहरात फिरताना आढळ्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी दिला आहे. तसेच ‘होम क्वारंटाईन’च्या सूचनांचे उल्लंघन करून गावात फिरणाऱ्या व्यक्तींची माहिती नागरिकांनी पोलीस पाटील, तलाठी अथवा ग्रामसेवक यांच्यामार्फत स्थानिक प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

विना परवानगी जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींची माहिती द्या

     विना परवानगी जिल्ह्यात कोणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तरीही इतर मार्गाने जिल्ह्यात विना परवानगी येणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे अशाप्रकारे एखादी व्यक्ती जिल्ह्यात, गावात दाखल झाल्यास नागरिकांनी याबाबतची माहिती संबंधित तहसील कार्यालय अथवा जिल्हा प्रशासनाच्या ८३७९९२९४१५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून अथवा व्हॉटसअप संदेशाद्वारे द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अत्यावश्यक कारणासाठीच मिळणार परवानगी

जिल्हा किंवा राज्याबाहेर जाण्याची परवानगी फ़क्त पोलिस महासंचालक किंवा जिल्हा पोलिस अधिक्षकच देणार 

     केवळ वैद्यकीय व अत्यावश्यक कारणासाठीच जिल्ह्याबाहेर अथवा राज्याबाहेर जाण्याची परवानगी देण्याच्या सूचना शासनाने दिल्या असून अशी परवानगी देण्याचे अधिकार राज्याचे पोलीस महासंचालक आणि संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यातून वैद्यकीय अथवा अत्यावश्यक कारणासाठी वाशिम जिल्ह्यात येवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी ते सध्या ज्या जिल्ह्यात आहेत, तेथील पोलीस उपायुक्त अथवा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही विभागाने, अधिकाऱ्यांनी दिलेली परवानगी ग्राह्य धरण्यात येणार नाही.
     अत्यावश्यक कारणासाठी महाराष्ट्रातून बाहेर राज्यात जाणाऱ्या व्यक्तींनी covid19.mhpolice.in या पोर्टलवर जावून पोलीस महासंचालक कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज करावा. या कार्यालयातील विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) यांना अशा परवानग्या देण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच वाशिम जिल्हांतर्गत प्रवासासाठी परवानगीकरिता सुद्धा या पोर्टलद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज करता येईल. मात्र, वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक कारणासाठी जिल्ह्याच्या बाहेर जाणे आवश्यक असल्यास याबाबतची रीतसर परवानगी घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच बाहेर जिल्ह्यातून परत वाशिम जिल्ह्यात येण्यासाठी संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक यांची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे.

No comments

Powered by Blogger.