Header Ads

वाशिम जिल्ह्यात १५ एप्रिल पर्यंत संचारबंदी कायम



वाशिम जिल्ह्यात १५ एप्रिल पर्यंत संचारबंदी कायम


वाशिम (जनता परिषद) दि. ०१ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांची गर्दी टाळणे हा एकमेव प्रभावी उपाय आहे. त्यामुळे या विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २ अन्वये जिल्ह्यात  ३१ मार्च २०२० पर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी यापूर्वी दिले होते. सदर आदेशात बदल करून आता १५ एप्रिल २०२० पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम १८९७ लागू करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रसाराला तत्काळ प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यात २३ मार्च ते ३१ मार्च २०२० या कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २ अन्वये संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी २३ मार्च रोजी दिले होते. संचारबंदी दरम्यान कोणतेही प्रार्थनास्थळ उघडे ठेवता येणार नाहीत, असे या आदेशात नमूद करण्यात आले होते. आता हे आदेश १५ एप्रिल २०२० पर्यंत लागू राहणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची गर्दी होवू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अत्यंत आवश्यकता असेल तरच नागरिकांनी कार्यालयात यावे. अन्यथा शासकीय कार्यालयात येणे टाळावे, तसेच सामुहिक निवेदने, अर्ज, तक्रारी, फिर्याद कार्यालयास प्रत्यक्ष येवून सादर करून नये, असे आदेश देण्यात आले होते. हे आदेश आता १५ एप्रिल २०२० पर्यंत लागू राहणार आहेत. तसेच जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करणे, बाहेरील जिल्ह्यातील व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेशास मनाई व अत्यावश्यक कारण वगळता जिल्ह्याबाहेर जाण्यास मनाई करण्याबाबतचा २३ मार्च २०२० रोजीचा आदेश सुद्धा १५ एप्रिल २०२० पर्यंत लागू राहणार आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी आज निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.
*****

No comments

Powered by Blogger.