Header Ads

जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने,

आस्थापना ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

·        कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
·        जीवनावश्यक वस्तू खरेदी करतांना गर्दी टाळा, साठा करू नका

वाशिमदि. २१ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांच्या गर्दीला प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्यामुळे किराणा, धान्य, दुध व दुग्धोत्पादन दुकाने, फळे-भाजीपाला दुकाने, मेडिकल, दवाखाने व पेट्रोलपंप या जीवनावश्यक सेवा वगळून जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने व आस्थापना २१ मार्च ते ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणूच्या संसर्गाने होणाऱ्या कोव्हीड-१९ या आजाराने राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे १३ मार्च २०२० पासून राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकाच ठिकाणी होणारी लोकांची गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्याकरिता प्रतिबंधात्मक  उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने वगळता जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने, आस्थापना, सर्व पान टपऱ्या, चहा टपऱ्या, स्नॅक्स हॉटेल व सर्व रेस्टॉरंट ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी दिले आहेत.
कोणत्याही व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंडसंहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ कलम २ अन्वये तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांनी घाबरू नये, जीवनावश्यक सेवा सुरु राहतील 

: जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक 
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांची गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने वगळता जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. किराणा, धान्य, दुध व दुग्धोत्पादन दुकाने, फळे-भाजीपाला यासारखी जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने, मेडिकल, दवाखाने व पेट्रोलपंप नियमितपणे सुरु राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी एकाचवेळी गर्दी करू नये. तसेच या वस्तूंचा साठा करून ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.



No comments

Powered by Blogger.