Header Ads

आदिवासी विद्यार्थ्यांनी पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घ्यावा - pandit dindayal upadhyay swayam yojna for students



आदिवासी विद्यार्थ्यांनी पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घ्यावा

आदिवासी विकास विभागाचे आवाहन

वाशिम, दि. 17 (www.jantaparishad.com) : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विभागीय व जिल्हास्तरावर इयत्ता 12 वी नंतर पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना  (pandit dindayal upadhyay swayam yojna for students) सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून आदिवासी विकास विभागाकडून सुरु करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील शहरामध्ये कार्यरत महाविद्यालयामध्ये इयत्त 12 वी नंतर पुढे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी/ विद्यार्थींनींना ही योजना लागू आहे. तसेच तालुका स्तरावर इयत्ता 12 वी नंतर तंत्रशिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळवून देण्याच्या दृष्टिने इयत्ता 12 वी नंतरच्या दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमासाठी तसेच महानगर पालिका, विभागीयस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तरापासून 5 कि.मी. च्या परिसरामध्ये स्थापित असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना स्वयंम योजनेअंतर्गत लाभ देण्याच्या अनुषंगाने सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून पात्र असलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अनुज्ञेय थेट रक्क्म जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेच्या अटी पुढीलप्रमाणे आहे, विद्यार्थी/ विद्यार्थींनी हे अनुसूचित जमातीचे असावे. विद्यार्थ्यांकडे व्यासयायिक अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अव्यवसायिक अभ्यासक्रमासाठी जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 2.50 लाखाचे आत असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे बंधनकारक आहे हे खाते आधार कार्डशी संलग्न असावे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या, तालुक्याच्या ठिकाणी आहे. अशा शहरातील सदर विद्यार्थ्यांचे पालक रहिवासी नसावेत. सदर विद्यार्थी इयत्ता 12 नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा तथापि 1 विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 7 वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल. विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थ्यांची संस्थेमधील/ महाविद्यालयातील उपस्थिती 80 टक्केपेक्षा अधिक असणे आवश्यक राहील. 

विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली संस्था मान्यताप्राप्त महाविद्यालय/ संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याने आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांस आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नौकरी अथवा व्यवसाय करीत नसावा. एका शाखेची पदवी मध्येच सोडून दुसऱ्या शाखेच्या पदवीसाठी प्रवेश घेतल्यास किंवा एका शाखेची पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण झाल्यानंतर इतर शाखेच्या पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. केंद्र शासनाच्या पोस्ट बेसिक मॅट्रीक शिष्यवृत्तीकरीता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल. तथापि 2 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. सदर योजनेमध्ये विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी फसवणुक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशिर कारवाईस पात्र राहील. वसतीगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर आपले प्रवेश अर्ज भरावे. असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोलाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे, यांनी कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.