Header Ads

कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या सूचना - Instructions to celebrate Independence Day by following all the rules prohibiting corona



कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या सूचना

मुंबई, दि. ३० : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापन दिन रविवार दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत शासनाने ४ जून २०२१ अन्वये आदेश पारित केले आहेत. गत वर्षीप्रमाणेच यावर्षीही राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. हा कार्यक्रम साजरा करताना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे निदेश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात सर्व विभागीय, जिल्हा, उपविभागीय, तालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा. पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती व कोकण विभागीय आयुक्त यांनी आपापल्या विभागातील तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालय येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संबंधित पालकमंत्री ध्वजारोहण करतील. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात यावा. या दिवशी सकाळी ८.३५ ते ९.३५ या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ८.३५ वाजेपूर्वी किंवा ९.३५ वाजेनंतर आयोजित करावा. राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत वाजविण्यात यावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅण्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजवावा. यावेळी करण्यात येणाऱ्या भाषणांचा विषय हा स्वातंत्र्यदिनाचे महत्व विषद करणारे तसेच उपस्थितांना देशाची एकता व अखंडता याकरीता कार्य करण्यासाठी प्रेरित करणारे असावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

ध्वजारोहण करणारे मंत्री, राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर पोहचू शकणार नसल्यास विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण करुन ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. संबंधित प्रांत अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय आणि सरपंच किंवा गाव प्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करतील. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडील तसेच कोरोनायोध्दे जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही नागरिकांना निमंत्रीत करावे. कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता स्वातंत्र्यदिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर (Social Distancing) संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होईल, याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची असेल, आयोजकांनी त्यानुसार मान्यवरांना निमंत्रित करण्याची कार्यवाही करावी. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा. सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. सुरक्षित वावराच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करावे व अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाइटद्वारे थेट प्रक्षेपण करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

या कार्यक्रमातून व सोशल मीडियाद्वारे ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणेचा प्रसार करावा. दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे: वृक्षारोपण, आंतर शालेय, आंतर महाविद्यालय स्तरावर ऑनलाईन पध्दतीद्वारे वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा, देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. महत्वाच्या योजनेचा शुभारंभ करावा. सोशल मिडीयाद्वारे निवडक विद्यार्थी, विद्यार्थिनींचे देशभक्तीपर गाणे, भाषणे आयोजित करावीत. शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एखाद्या विषयाचा वेबिनार आयोजित करावा, एनएसएस व एनवायकेएसद्वारे देशभक्तीपर ऑनलाईन मोहिम राबविण्यात यावी, तसेच सोशल मिडीया व डिजीटल माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मतेसंबंधातील गाण्यांचा प्रचार करावा, संदेश द्यावा, नागरिकांनी घराच्या बाल्कनी, गच्चीवरुन राष्ट्रीय ध्वज हलविणे, याप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देखील स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर तसेच ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांवर (उदा. रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, वसई, प्रतापगड, दौलताबाद, सिताबर्डी) राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.  राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक दिनांक २० मार्च १९९१, ५ डिसेंबर १९९१ आणि ११ मार्च १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याचीही दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची व सुर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी. पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती विभागीय आयुक्त हे त्यांच्या मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाची व्यवस्था करणार असल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही. कोकण विभागीय आयुक्त हे कोकण भवन येथील समारंभाची व्यवस्था करतील. मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहणाची कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही.

याप्रमाणे सर्वसाधारण निदेश देण्यात आले असले तरी कोविड १९ सकारात्मक दर (Positivity Rate) विचारात घेऊन संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी आपआपल्या अधिकारक्षेत्रात स्वातंत्र्य दिनाचे महत्व लक्षात घेऊन साजेसा समारंभ साजरा करण्यासंबंधी पालकमंत्री यांच्या सहमतीने आवश्यक ती उचित कार्यवाही करण्यासाठी मुभा देण्यात येत आहे.

यासंदर्भातील शासन परिपत्रक आज सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत निर्गमित करण्यात आले असून ते राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments

Powered by Blogger.