यंदाचा दीपावली उत्सव साधेपणाने साजरा करा - जिल्हा प्रशासनाचे आवाहन Celebrate this year's Diwali with simplicity
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे आवाहन
वाशिम, दि. ०७ (जिमाका) : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा दीपावली उत्सव साधेपणाने साजरा करावा. तसेच कोरोना विषाणू संसार्गासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.
राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. चालू वर्षी कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेवून गेल्या सात-आठ महिन्यात झालेले सर्व धर्मीय सण, उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्र गर्दी न करता साजरे केले आहेत. यावर्षीचा दीपावली उत्सव कोविड-१९ कालावधीत साजरा केलेल्या अन्य सण, उत्सवांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेवून अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा. कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे साजरा केला जाणारा दीपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील, याची दक्षता घेण्यात यावी. उत्सव कालवधीत नागरिकांनी, विशेष करून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी व मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग, संक्रमण वाढणार नाही.
दीपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवा दरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणवर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायू व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमांत्रांच्या आरोग्यागावर होणारे विपरीत परिणाम दीपावली उत्सवानंतरही बऱ्याच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोना संसर्ग झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम होवून त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेवून नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे, त्याचा तरस होऊ शकतो. त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करून उत्सव साजरा करावा. या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम, कार्यक्रम उदा. दीपावली पहाट आयोजित करण्यात येवू नयेत. आयोजित करावयाचे असल्यास ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमाद्वारे त्याचे प्रसारण करून गर्दी टाळावी.
सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, रक्तदान शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याविषयी जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येवू नये, याची दक्षता घ्यावी. कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
Post a Comment