Header Ads

सर्वशक्तीपणाला लावून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


 
सर्वशक्तीपणाला लावून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उस्मानाबाद, दि.२१ (जिमाका) :- नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला आलो असून या भागातील शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. परंतु शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा. सरकार म्हणून आम्ही सर्वशक्तीपणाला लावून त्यांना मदत करून पुन्हा उभे करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिला.

तुळजापूर तालुक्यातील कात्री या गावी अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची व खरडून वाहून गेलेल्या जमिनीची दि.२१ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्यासह इतर मान्यवरांनी पाहणी केली. गावातील शेतकऱ्यांशी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात संवाद साधुन त्यांना धीर दिला. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे-पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, कात्रीचे सरपंच किशोर गोडगिरे, अपसिंगाचे सरपंच वैशाली गोरे, उपसरपंच दिपक सोनवणे आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, एकही नुकसानग्रस्त शेतकरी पीक नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही या दृष्टीने व्यवस्थ‍ितरित्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत तसेच शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून निश्चितपणे शेतकऱ्यांना मदत करेल असे आश्वासनही  त्यांनी दिले.

यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले. यामध्ये अपसिंगा येथील अर्चना युवराज पाटील, सुवर्णा लोके, हिराबाई दत्तु कटकधोंड यांना तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येकी 30 हजार रूपयांचे धनादेश देण्यात आला. दरम्यान मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री यांनी अपसिंगा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला

No comments

Powered by Blogger.